नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह दिन मानवी हक्क, न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठीचा सत्याग्रह ! (Kalaram Temple Satyagraha Day in Nashik Satyagraha to establish human rights, justice and equality !)

Vidyanshnewslive
By -
0
नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह दिन मानवी हक्क, न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठीचा सत्याग्रह ! (Kalaram Temple Satyagraha Day in Nashik Satyagraha to establish human rights, justice and equality !)

नाशिक :- २ मार्च १९३० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या सत्याग्रहाने सामाजिक समतेच्या लढ्याला नवा आयाम दिला. हा लढा केवळ मंदिर प्रवेशासाठी नव्हे, तर मानवी हक्क, न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी होता. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. माणूस म्हणून आपल्याला हा समाज स्वीकारण्यास तयार आहे की नाही याची पडताळणी या सत्याग्रहाद्वारे आपण करणार आहोत', असे बाबासाहेबांनी म्हटले होते. त्यादृष्टीने या लढ्याला विशेष महत्व होते. आजच्या दिवशी, आपण या लढ्यातील त्या शूर सत्याग्रहींच्या त्याग आणि संघर्षाला अभिवादन करूया, त्यातून प्रेरणा घेऊया आणि समाजात समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचा संकल्प करूया. काळाराम मंदिर हे धार्मिकतेचे केंद्रबिंदू आहेच परंतु, ते चळवळीचे केंद्रही होते हे लक्षात येते मंदिराच्या पूर्व दरवाजाबाहेर असलेल्या सत्याग्रहाच्या कीर्तिमान शिलालेखावरून. या सत्याग्रहाला आज, दि. २ मार्च रोजी 96 वर्षे पूर्ण होत आहेत. आजही हा शिलालेख येथे रक्त सांडलेल्या वीरांच्या कार्याने लखलखतो आहे. काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही एक क्रांतिकारक घटना होती. जातिव्यवस्थेच्या बुरुजाला सुरूंग लावण्याचे काम या घटनेने केले. महाराष्ट्र शासनाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड जन्मशताब्दी वर्षानिमित्त एक समिती स्थापन केली. या समितीने सरकारकडे पाठपुरावा करून अनेक योजना राबवल्या. त्याप्रमाणे काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ या ऐतिहासिक घटनेचे स्मरण करून देणारा कीर्तिमान शिलालेख उभारण्याचे काम याच समितीने केले. काळाराम मंदिर सत्याग्रहासंदर्भात देवळाली येथे १७ नोव्हेंबर, १९२९ रोजी सभा घेण्यात आली. या सभेचे अध्यक्ष संभाजी रोकडे तर भाऊराव उर्फ दादासाहेब गायकवाड हे चिटणीस होते. नाशिकच्या सत्याग्रहाची पहिली रुपरेषा येथेच ठरली. त्र्यंबकेश्वरच्या निवृत्तिनाथ यात्रेच्या वेळी म्हणजेच २५ जानेवारी, १९३० रोजी एक टोलेजंग सभा घेण्यात आली. या सभेत बाबासाहेब स्वत: येणार होते, पण काही कारणास्तव ते येऊ न शकल्याने अमृतराव रणखांबे यांनी अध्यक्षपद भूषविले. 
       २ मार्चपर्यंत आठ हजार भीमसैनिक सत्याग्रहात सामिल होण्यासाठी येऊ न दाखल झाले. तेव्हा नाशिकचे जिल्हाधिकारी आर. डी. गार्डन होते. त्यांच्या लक्षात आले की, उभे नाशिक धुमसत आहे. त्यांनी आयुक्त घोषाळ यांना रिपोर्ट केला. सनातनी ऐकायला तयार नाहीत किंवा बाबासाहेबही सत्याग्रह मागे घ्यायला तयार नाहीत. एकूण परिस्थिती फार स्फोटक होत गेली. बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली २ मार्चला सकाळी १० वाजता सभा भरविण्यात आली. तीन वाजता १५ हजार लोकांची एक मिरवणूक निघाली. मिरवणूक गोदावरीच्या घाटाकडे वळली. एक जंगी सभा घेऊन मिरवणूक विसर्जित करण्यात आली. सत्याग्रहींच्या चार तुकड्या पाडण्यात आल्या. प्रत्येक तुकडीत दीडशे सत्याग्रही होते. या तुकड्या मंदिराच्या चारी दरवाजावर सकाळपासून ठाण मांडून बसल्या. पतितपावनदास (उत्तर दरवाजा), कचरू साळवे (पूर्व दरवाजा), पांडुरंग राजभोज (दक्षिण दरवाजा) व शंकरदास नारायणदास (पश्चिम दरवाजा) असे चार खंदे सरदार मंदिराच्या चारी दिशांवर आपापल्या आघाड्या सांभाळत होते. बाबासाहेब अन् भाऊराव हे प्रत्यक्ष सत्याग्रहाच्या ठिकाणी सगळी व्यवस्था पाहात होते. मंदिराचे सर्व दरवाजे बंद होते. दरवाजे उघडल्यास सत्याग्रही मंदिरात प्रवेश करणार आणि रामाचे दर्शन घेणार असे ठरले होते. १९३० वर्ष नवीन विचारांचे, प्रतिकाराचे, पराक्रमाचे व दोन जगप्रसिद्ध सत्याग्रहाचे म्हणून भारताच्या इतिहासात अनंतकाळापर्यंत आठवले जाणारे वर्ष. २ मार्च १९३० ला बाबासाहेबांनी नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू केला आणि तिकडे १२ मार्च १९३० मध्ये महात्मा गांधींनी दांडीयात्रा सुरू केली गांधीचा लढा राजकीय होता, तर बाबासाहेबांचा सामाजिक होता. सत्याग्रहाचा शिलालेख नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाने ज्वलंत इतिहासाचे पान उघडले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, अमृतराव रणखांबे, तुळशीराम संभाजी काळे, शिवराम मारू, पांडुरंग जिबाजी सबनीस, गणपत सज्जन कानडे, सावळेराम दाणी, संभाजी रोकडे, भवानराव बागूल इत्यादी कार्यकर्त्यांनी केशव नारायण देव यांच्या अध्यक्षतेखाली विहीतगाव-देवळाली येथे मंदिर प्रवेशाची घोषणा केली.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्यूज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)