३१ जानेवारी १९२० रोजी 'मुकनायक' चा पहिला अंक प्रकाशित (The first issue of Mooknayak was published on January 31, 1920.)

Vidyanshnewslive
By -
0
३१ जानेवारी १९२० रोजी 'मुकनायक' चा पहिला अंक प्रकाशित (The first issue of Mooknayak was published on January 31, 1920.)


वृत्तसेवा :- मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९२० साली सुरु केलेले साप्ताहिक वृत्तपत्र होते. डॉ. आंबेडकरांनी या साप्ताहिकाचा पहिला अंक दिनांक ३१ जानेवारी १९२० रोजी प्रकाशित केला होता. मूकनायकसाठी छ. राजर्षी शाहू महाराजांनी २,५०० रुपयांची मदत दिली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. सर्वांना ज्ञात आहे की, बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती. मात्र त्याच वेळी महात्मा गांधी स्वत:ला दलितांचे हितचिंतक दाखविण्यासाठी आपले एक वृत्तपत्र ‘हरीजन’ इंग्रजी भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.


            या साप्ताहिकाचा उद्देश दीन-दुबळ्यांचा आवाज शासन आणि जनते पर्यंत पोहचवणे हा होता.
समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी 'मुकनायक' या पत्राच्या पाक्षिकाच्या 31 जानेवारी, 1920 रोजी जन्म झाला होता. मूक अशा अस्पृश्यांचे नायकपण-नेतेपण आपण स्वीकारल्याचे मूकनायक काढून इ.स. १९२० साली त्यांनी जाहीर केले. मूकनायकाने त्यांच्या पुढील घणाघाती चळवळीची नांदीच जणू म्हटली. यासाठी त्यांना राजर्षी शाहू महाराज यांचे आर्थिक सहकार्य लाभले होते. त्यामुळे पहिल्या अंकाच्या संपादकीयामध्ये ही जन्मप्रतिज्ञा अशी व्यक्त केली. आमच्या या बहिष्कृत लोकांत होत असलेल्या व पुढे होणाऱ्या अन्यायावर उपाययोजना सुचविण्यास तसेच त्यांची भावी उन्नती व तिचे मार्ग यांच्या खऱ्या स्वरुपाची चर्चा होण्यास वर्तमानपत्रासारखी अन्य भूमीच नाही. परंतु मुंबई इलाख्यात निघत असलेल्या वृत्तपत्राकडे पाहिले असता असे दिसून येईल की, त्यातील बरीचशी पत्रे विशिष्ट अशा जातीचे हितसंबंध पाहणारी आहेत. इतर जातीच्या हिताची पर्वा त्यांना नसते इतकेच नव्हे तर, केव्हा केव्हा त्यांना अहितकारक असेही त्यातून प्रलाप निघतात. अशा वृत्तपत्रकारांना आमचा इशारा एवढाच की, कोणतीही एखादी जात अवगत झाली तर तिच्या अवनतीचा चटका इतर जातीत बसल्याशिवाय राहणार नाही. समाज ही नौकाच आहे. ज्याप्रमाणे आगबोटीतून प्रवास करणाऱ्या उतारुने जाणूनबुजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीस छिद्र पाडले तर सर्व बोटीबरोबर त्यालाही आधी किंवा मागाहून जलसमाधी ही घ्यावीच लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, अप्रत्यक्ष नुकसान करणाऱ्या जातीचेही नुकसान होणार यात बिलकूल शंका नाही. म्हणूनच स्वहितसाधू पत्रांनी इतरांचे नुकसान करुन आपले हित करावयाचे पढतमुर्खाचे लक्षण शिकू नये. मूकनायकाचे ध्येय धोरण स्पष्ट करण्यासाठी त्यावर पुढील बिरुदावली छापली जात असे. काय करुन आता धरुनिया भीड | नि:शक हे तोड वाजविले ||1|| नव्हे जगी कोण मुकियाचा जाण | सार्थक लाजोनी नव्हे हित ||2|| तुकारामाच्या या ओळी त्यांनी बिरुदासाठी निवडाव्या यात केवढे तरी औचित्य आहे. वृत्तपत्राचे 'मूकनायक' हे नावही त्यांना नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण या चरणावरुन सुचले आहे हे निश्चित. बाबासाहेब विलायतेला गेले व १९२३ मध्ये 'मूकनायक' बंद पडले. पहिला अंक - मूकनायक च्या पहिल्या अंकातील मजकूर पुढील प्रमाणे, “हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजला होय. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की, या मनोऱ्याला शिडी नाही आणि म्हणून एका मजल्यावरुन दुसऱ्या मजल्यावर जाण्याचा मार्ग नाही. ज्या मजल्यात ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यात त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला माणूस कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाही व वरच्या मजल्यातला माणुस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची प्रज्ञा नाही.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)