चंद्रपूर :- महाराष्ट्रात आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात असून, त्यांचे प्रतिनिधित्व एकत्रित स्वरूपात होणे आजच्या घडीला अत्यंत गरजेचे आहे. याआधी अनेक वेळा रिपब्लिकन ऐक्यासाठी प्रयत्न झाले, निवडणुका एकत्र लढल्या; पण ही ऐक्य प्रक्रिया फार काळ टिकली नाही. मात्र आता केवळ एक दिवसाचे नव्हे, तर दीर्घकाळ टिकणारे, मजबूत आणि परिणामकारक रिपब्लिकन ऐक्य व्हावे, यासाठी आम्ही कायमच तयार आहोत, असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. चंद्रपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आरपीआय (आठवले गट) चे अशोक घोटेकर, जयप्रकाश कांबडे, राजू भगत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. रिपब्लिकन ऐक्य टिकवायचे असेल, तर 'रिपब्लिकन कोअर कमिटी' स्थापन करणे गरजेचे आहे. या समितीत जो निर्णय बहुमताने घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
बोधगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या हाती सोपवण्यात यावा, ही मागणी योग्य असल्याचेही आठवले यांनी ठामपणे सांगितले. सध्या हे विहार बिहार राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे हा विषय केंद्राच्या अधिकारात नसला, तरीही आम्ही 'महाबोधी विहार कायदा १९४९' रद्द करण्यासाठी आणि विहार बौद्धांकडे सुपूर्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले. नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्वीकारावा. नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आंबेडकरवाद स्वीकारावा. आंबेडकरांचे विचार हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहेत. शांततेच्या मार्गावर चालणे हेच समाजहिताचे असल्याचे ना. आठवले म्हणाले. चंद्रपूर ही आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. येथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या प्रेरणेतूनच आम्ही आजही आमची राजकीय वाटचाल सुरू ठेवली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या