भारताच्‍या सर्वसमावेशक विकासाचा संकल्‍प मांडणारा अर्थसंकल्‍प, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्‍पाचे केले स्‍वागत. तर आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल - आ. किशोर जोरगेवार (The economic plan for the comprehensive development of India. Sudhir Mungantiwar welcomed the Union Budget. So an important step towards self-reliant India - Kishore Jorgewar)

Vidyanshnewslive
By -
0
भारताच्‍या सर्वसमावेशक विकासाचा संकल्‍प मांडणारा अर्थसंकल्‍प, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्‍पाचे केले स्‍वागत. तर आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल - आ. किशोर जोरगेवार (The economic plan for the comprehensive development of India. Sudhir Mungantiwar welcomed the Union Budget. So an important step towards self-reliant India - Kishore Jorgewar)


वृत्तसेवा :- पंतप्रधान विश्‍वगौरव नरेंद्रभाई मोदी यांच्‍या सबका साथ - सबका विकास - सबका विश्‍वास या धोरणानुसार भारताच्‍या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्‍प हा शेतकरी, महिला, युवक, नोकरदार आदी सर्वच घटकांना न्‍याय देणारा भारताच्‍या सर्वसमावेशक विकासाचा संकल्‍प मांडणारा अर्थसंकल्‍प असल्‍याची प्रतिक्रिया आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. देशाला विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर करणारा अर्थसंकल्‍प सादर केल्‍याबद्दल आमदार मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांचे अभिनंदन केले आहे. या अर्थसंकल्‍पात शेतकरी वर्गाला अर्थमंत्र्यांनी केंद्रास्‍थानी ठेवले आहे. विशेषतः कापूस उत्‍पादकांसाठी ५ वर्षांचे पॅकेज, कापुस उत्‍पादक मिशन, स्‍वस्‍त व्‍याजदरावर शेतक-यांना ५ लाखापर्यंतचे कर्ज हे संकल्‍प देशातील शेतक-यांना दिलासा देणारे आहे. कापुस उत्‍पादक शेतक-यांना केंद्र सरकारने दिलेली ही विशेष भेट आहे. त्‍याचप्रमाणे आर्थिक घडामोडींमध्‍ये ७० टक्‍के महिलांचा असलेला सहभाग तसेच अनुसुचित जाती व जमातींच्‍या महिलांना उद्यमी म्‍हणून प्रोत्‍साहन देण्‍याचा संकल्‍प महिला विकासाला चालना देणारा आहे. एमएसएमईसाठी नॅशनल मॅन्‍युफॅक्‍चरींग मिशनची घोषणा या क्षेत्राला प्रोत्‍साहन देणारी आहे. तसेच एमएसएमईसाठी मोठी तरतूद करण्‍यात आली आहे. मत्‍स्‍य उत्‍पादनाला मोठे प्रोत्‍साहन देखील देण्‍यात आले आहे. कमी उत्‍पन्‍न असलेल्‍या जिल्‍हयांसाठी धनधान्‍य योजना शेतकरी व गरीब नागरिकांना दिलासा देणारी आहे. युवकांसाठी कौशल्‍य प्रशिक्षणाच्‍या योजना व त्‍यासाठी करण्‍यात आलेली तरतूद युवक कल्‍याणाबद्दल सजगता दर्शविणारी आहे. पर्यटन विकासाला चालना देण्‍यासाठी ५० पर्यटन स्‍थळे विकसित करण्‍याचा संकल्‍प तसेच मेडीकल टूरिझम ही संकल्‍पना राबविण्‍याचा संकल्‍प पर्यटन विकासाला चालना देणारा आहे. पायाभूत सुविधांच्‍या विकासावर भर देत करण्‍यात आलेली तरतूद विशेष महत्‍वपूर्ण असून येत्‍या १० वर्षात १२० विमानतळ विकसित करण्‍याचा तसेच नविन काही ग्रीनफिल्‍ड विमानतळ विकास विकसित करण्‍याचा संकल्‍प देखील महत्‍वाचा आहे. आर्थीक सुधारणा करताना करदात्‍यांना मोठा दिलासा अर्थमंत्र्यांनी दिला आहे. देशातील मध्‍यमवर्गीयांना या माध्‍यमातुन मोठा दिलासा दिला आहे. १२ लाख रू. पर्यंत उत्‍पन्‍न असलेल्‍यांवर कोणताही कर न आकारण्‍याचा निर्णय अतिशय महत्‍वाचा असून कॅन्‍सर व इतर गंभीर आजारांसाठीची औषधे करमुक्‍त करण्‍याचा निर्णय देखील दिलासा दायक आहे. याशिवाय सुक्ष्‍म उद्योगांसाठी कस्‍टमाईज क्रेडीट कार्ड, छोटया गुंतवणुकदारांना प्रोत्‍साहन ही देखील महत्‍वाची पाऊले सरकारने उचलली आहे. सर्वच क्षेत्रातील सर्वच घटकांना न्‍याय देत महागाई नियंत्रणात आणण्‍यासाठी केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्‍प देशाला प्रगतीपथावर नेणारा असल्‍याची प्रतिक्रिया आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. 
              अर्थसंकल्प प्रतिक्रिया व्यक्त करतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणालेत की, केंद्रीय अर्थसंकल्प 2025 हा आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक विकासावर भर देणारा आहे. मध्यमवर्गीय नागरिक, शेतकरी, उद्योजक आणि तरुणांना प्रोत्साहन देणाऱ्या योजनांचा यात समावेश असून भारतीय अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी ठोस निर्णयांचा हा अर्थसंकल्प असल्याचे प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे. गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाईल, असे अर्थसंकल्पात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी देखील मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून, धनधान्य योजना सुरू करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. तसेच, किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ३ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. कृषी क्षेत्रासाठी दिलेल्या विशेष तरतुदींमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि आधुनिक शेतीला चालना मिळेल. त्याचप्रमाणे, पायाभूत सुविधा, उद्योग आणि उत्पादन क्षेत्रासाठी भरीव तरतुदी केल्यामुळे नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. मध्यमवर्गीयांसाठी करसवलतींची तरतूद ही जनसामान्यांना मोठा दिलासा देणारी आहे. तसेच, नवीन स्टार्टअपसाठी भांडवली गुंतवणुकीला चालना देणाऱ्या योजनांमुळे युवकांना नवीन संधी उपलब्ध होतील. शहरी कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. उत्पादन क्षेत्रात अधिकाधिक युवकांना संधी मिळावी यासाठी त्यांच्या कौशल्य विकासावर भर दिला जाणार आहे. तसेच, पर्यटन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम केले जाणार असून, ५० नवी पर्यटन स्थळे विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. महत्त्वाच्या ३६ औषधांवरील कस्टम ड्युटी हटविण्यात आल्याने औषधे स्वस्त होतील, ज्याचा थेट फायदा सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. एकंदरीत, हा अर्थसंकल्प आर्थिक स्थैर्य, गुंतवणूक वाढ, रोजगारनिर्मिती आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देणारा असून, भारतीय अर्थव्यवस्थेला बळकट करणारा आहे. देशाच्या प्रगतीसाठी हा संकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरेल, अशी प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)