बल्लारपूर :- वाचन, आकलन, उपयोजन, मूल्यांकन आणि सर्जनशीलता हे टप्पे निर्दोष लेखनासाठी महत्त्वाचे आहेत. भाषा शुद्ध अशुद्ध नसते. असे प्रतिपादन डॉ सतिश कर्नासे यांनी केले आहे महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर मध्ये मराठी विभागाच्या वतीने आयोजित मायमराठी गौरव महोत्सवात शुक्रवारी (दि.27) वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात बोलत होते. यावेळी विचारमंचावर डॉ. बादलशाह चव्हाण, डॉ. रोशन फुलकर, डॉ. बालमुकुंद कायरकर डॉ. स्वप्नील बोबडे, डॉ. किशोर चौरे, प्रा. शुभांगी भेंडे, प्रा. विभावरी नखाते यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज (विठ्ठल वामन शिरवाडकर) यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले. डॉ.सतिश कर्नासे पुढे म्हणाले, फक्त भाषेचा वापर करून भाषाप्रभू होता येत नाही. भाषा शुद्ध अशुद्ध नसते. भाषा प्रमाण आणि बोली असते. वाचन, आकलन, उपयोजन, मूल्यांकन आणि सर्जनशीलता हे टप्पे निर्दोष लेखनासाठी महत्त्वाचे आहेत. भाषा नीटनेटकी लिहितो म्हणजे शुद्धलेखन करतो आणि संस्कृती जपतो. व्याकरण शब्दांची परंपरा सांगते, नियमन करते. शुद्धलेखन आग्रह न राहता ती सवय झाली पाहिजे. निर्दोष लेखन कसे करावे, सामान्यरूपे कशी लिहावीत, अनुस्वार कुठे असावा, कुठे नसावा, विसर्गयुक्त शब्द, विरामचिन्हे, लेखन नियम बदलाचा इतिहासही यांनी उलगडला.
प्रास्ताविक करताना डॉ.स्वप्नील बोबडे म्हणाले, या लेखनात चूक झाली तर राग यायला हवा. जशी समाजात व्यवस्था निर्माण केली तशी भाषेची एक व्यवस्था निर्माण केली आहे. भाषेबद्दल आपल्याला वेड लागलं पाहिजे. आपली सही आणि घरावरील पाटी मराठीत असावी. आपल्याकडे मराठी मासिके नीट चालत नाही. मराठी पुस्तकाची आवृत्ती ११०० वरून १०० वर आली आहे. या कार्यक्रमाला कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068


टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या