Advertisement

Responsive Advertisement

Live cricket

चंद्रपूर जिल्ह्यात १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत पक्षकार व नागरिकांनी सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन (Appeal to litigants and citizens in Chandrapur district to avail themselves of the golden opportunity offered by the National Lok Adalat on September 12.)

चंद्रपूर जिल्ह्यात १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत पक्षकार व नागरिकांनी सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन (Appeal to litigants and citizens in Chandrapur district to avail themselves of the golden opportunity offered by the National Lok Adalat on September 12.)

चंद्रपूर -: चंद्रपूर जिल्ह्यात शनिवार, दि. 12 सप्टेंबर 2026 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. विधिज्ञ, पक्षकार व नागरिकांनी या लोक अदालतीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपसी समझोत्याद्वारे प्रकरणे निकाली काढण्याच्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष अभय लाहोटी यांनी केले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे. आपसी समझोत्याने प्रकरणांचा त्वरित निपटारा झटपट निकाल हे लोक अदालतीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे आपसी समझोता आणि सर्वसंमतीने त्वरित निकाली काढता येतात. लोक अदालतीमध्ये झालेल्या निर्णयाला दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्या इतकेच महत्त्व असून त्याची अंमलबजावणी ही करता येते. लोक अदालतीमुळे पक्षकारांचा वेळ, पैसा आणि श्रमाची बचत होते. वादांचा सामंजस्याने कायमस्वरूपी निपटारा होतो आणि भविष्यातील वाद टाळण्यास मदत होते. विशेष म्हणजे या कार्यवाहीसाठी स्वतंत्र शुल्काचा खर्च करावा लागत नाही.
             चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये एकाच दिवशी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी स्वरूपातील तडजोड योग्य प्रकरणे, कलम १३८ एन.आय. ॲक्ट अंतर्गत धनादेश न वठण्याची प्रकरणे, बँक कर्जवसुली, मोटार वाहन अपघात नुकसानभरपाई, जमीन अधिग्रहण, कामगार कायद्याखालील प्रकरणे, मालक-भाडेकरू वाद, कौटुंबिक वाद (विवाह विच्छेदन वगळता) तसेच विद्युत कायद्यांतर्गत तडजोडयोग्य वाद सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवता येणार आहेत. याशिवाय न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची प्रि-लिटीगेशन प्रकरणे, महसूलविषयक प्रकरणे, पाणीपट्टी आणि वीजबिलासंबंधी तडजोडयोग्य प्रकरणे देखील आपसी समझोत्यासाठी लोक अदालतीसमोर ठेवता येतील. अधिक माहितीसाठी संपर्क ज्या नागरिकांना आपली प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधित न्यायालय अथवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक ०७१७२-२७१६७९ किंवा कार्यालयीन मोबाईल क्रमांक ८५९१९०३९३४ वर संपर्क साधता येईल. विधिज्ञ, पक्षकार आणि नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली तडजोड योग्य प्रकरणे सामंजस्याने निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुधीर इंगळे यांनी केले आहे.

संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या