वृत्तसेवा -: "नेपाळ येथील बुद्ध विहारात २० मिनिटे उशीर झाल्याने आमचे प्राण वाचले, याची जाणीव झाल्यानंतर डोळ्यांत अश्रू आणि मनात अविश्वसनीय घडल्याची भावना निर्माण झाली," अशी माहिती नेपाळमधील भीषण पुरात अडकलेला केरळमधील ३१ जणांचा समूह रविवारी सुखरूप राज्यात परतल्यानंतर यातील काही भाविकांनी दिली. बुद्ध विहारात झालेल्या विलंबामुळे कशा प्रकारे आपला जीव वाचला आणि त्यानंतरच्या भयावह रात्रीत त्यांनी कशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना केला, याची माहिती समूहातील सदस्यांनी दिली. सुरक्षित ठिकाणाच्या शोधात त्यांना योग्य अन्न किंवा मूलभूत गरजा भागवण्याची संधी नसतानाही पायी चालावे लागले. या सर्व परिस्थितीचा सामना करण्यापूर्वीच त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी त्यांच्यापासून सुमारे ६०० फूट खाली इमारतींना काही सेकंदांतच भीषण पुराच्या पाण्याने वाहून जाताना पाहिल्याचे या भाविकांनी सांगितले. "आमच्या समूहातील महिलांच्या विनंतीवरून आम्ही नेपाळ मधील बुद्ध विहारात दर्शनासाठी गेलो तिथे सुमारे २० ते २५ मिनिटे थांबलो. या विलंबामुळेच आम्ही त्या दुर्घटनेतून वाचलो," असे समूहातील एका पुरुषाने प्रसारमाध्यमाशी बोलतांना सांगितले. समूहातील आणखी एका सदस्याने सांगितले की, पोलिसांनी आम्हाला वाटेतच रोखले. आम्ही खाली पाहिले तेव्हा सुमारे ६०० फूट खाली लोक सैरावैरा धावताना दिसले. पाण्याचा प्रचंड लोंढा आला आणि त्याने तेथील सर्व इमारती वाहून नेल्या. काही सेकंदांतच संपूर्ण परिसर सपाट मैदानासारखा दिसू लागला.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या