यवतमाळ :- भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या यवतमाळ दौऱ्यावरून जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. बागेश्वर धामचे धिरेंद्र शास्त्री यांची भेट आणि अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत शहरातील स्वागत फलक फाडले. दुसरीकडे काही बॅनर धास्तीने उतरवले गेले असल्याची माहिती समोर येत आहे. कार्यक्रमासाठी लावलेले बॅनर लावणाऱ्या वकिलांच्या घरी धडकले असून आक्रमक आंबेडकरी कार्यकर्त्यांनी त्यांना खडसावून जाब विचारला, त्यानंतर बॅनर हटवण्यात आले. दरम्यान, जवाहरलाल दर्डा विधी महाविद्यालयातील कार्यक्रमासाठी गवई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असले तरी वाढत्या तणावामुळे त्यांच्या दौऱ्यावर अनिश्चिततेचे सावट आहे. सोशल मिडियावर दौरा रद्द झाल्याचे बोलले जात असले तरी, अधिकृतरीत्या दौरा रद्द झाल्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र या घटनेमुळे आंबेडकरी समाजातून वाढता रोष लक्षात घेऊन भविष्यात भूषण गवई यांचे आंबेडकरी समाजात कार्यक्रम होणे कठीण असल्याचे बोलले जात आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या