रोखठोक -: प्रा. महेश पानसे
मूल :- ज्या कामाची गरज आहे ते करायचे नाही व ज्या कामावर शहरवासीयांना आक्षेप आहे अशा कामांसाठी वळवळ करायची. एवढ्यात न. प. प्रशासनास ही सवय जडल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. घनकचऱ्यातून जनतेच्या पैशाचा निचरा करण्यासाठी गत 2 महिन्यापासून घामाघूम होऊनही धावपळ करणाऱ्या न. प. प्रशासनास क्रांतीसूर्य-क्रांतीज्योती फुलेंच्या नावाने चौकाचे सौदर्यीकरण करण्यात अडसर निर्माण करण्यात आनंद मिळत आहे का? असा संतप्त सवाल शहरात उपस्थित होत आहे. या महान सुधारकांच्या नावाची न. प. ला "एलर्जी" आहे की यातही ठेकेदाराची अडवणूक करून आधी 'सरेंडर करायला लावण्याचा अर्थपूर्ण हेतू आहे का? अशी भावनिक विचारणा होताना दिसते. 9 महिने लोटले. फूले चौकाचे सौदर्यीकरण करण्यासाठी 25 लाखाचा निधी तयार आहे. कल्याणी मजूर संस्थेला आक्टो. 2025 ला बांधकाम सुरू करण्यासाठी कार्य-आदेश देण्यात आला आहे. सा. बा. उपविभाग निधी खर्च करायला एका पायावर तयार आहे. मात्र न. प. प्रशासनाने खुटी मारुन ठेवल्याने फुले चौकाचे सौदर्यीकरण रखडल्याची बाब दुदैवाने पुढे आली आहे. अत्यंत संतापजनक बाब म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करताना पुढे पुढे करणारी नगरसेवक मंडळी व बहुसंख्येने असलेल्या समाजाच्या(ओबीसी) कृपेने नगराध्यक्ष पदावर आरूढ झालेली सावित्रीबाईंची लेक नगराध्यक्ष पदावर असताना महान सुधारकांच्या नावांची विटंबना करणे कितपत योग्य ठरते? हा सवाल वेदनादायी ठरतो.
न. प. ला या सौदर्यीकरण कामातील अडसर दूर करायला कितीसा वेळ लागेल, दोन दिवसात कामात अडसर ठरलेला न. प. चा बिऱ्हाड उचलायला पुरेशा आहे. मात्र 9 महिन्याचा कालावधी लोटूनही न. प. ने कुठल्या उद्देशाने अडंगा टाकला हे तरी स्पष्ट करावे. प्रशासक काळात फुले चौकाचे सौदर्यीकरण मंजूर झाले. त्यावेळी ज्या तत्परतेने मुख्याधिकारी महोदयांनी पुढाकार घेतला ती तत्परता " न. प. वर बाॅडी" बसताच लयास का जावी ? नगराध्यक्षा, नगरसेवक, सभापतीगण, सुद्धा ऐवढे निष्टूर, तेही महान सुधारकांच्या नावांच्या चौकाचे सौदयींकरण करायला?
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यांना गुरू स्थानी ठेवले त्या फुल्यांच्या नावे असलेल्या चौकाचे सौदर्यीकरण करण्यात अडसर आणणाऱ्यांना न. प. कार्यालयात या महान विभूतींचे फोटो लावायचा तरी कुठे अधिकार आहे? असी संतप्त भावना व्यक्त होते व ती स्वाभाविक ठरते.
समाजाचे नगरसेवक व नेते गप्प कसे? क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले माळी समाजाचे दैवत आहेत. आश्चर्य या गोष्टीचे आहे की मूल शहरात बहुसंख्येने बसलेल्या समाज बांधवांचे नेते व विशिष्ट समाजातून नगरसेवक असलेले लोकप्रतिनिधी गत 9 महिन्यांपासून गप्प कसे? हा सवाल झिणझिण्या आणणारा आहे. न. प. वर कांग्रेस ची सत्ता आहे. तालुका अध्यक्ष याच समाजाचे तर अनेक नगरसेवक याच समाजातून आहेत. शहरात समता परिषदेचे सुशिक्षित पदाधिकारी बहुसंख्येने आहेत मात्र फुले चौकाचे सौदंर्यीकरण या विषयावर तेवढे गंभीर आहेत का? असते तर 9 महिण्यांपासून महान सुधारकांच्या, आपल्या दैवताचे अपमान कसा काय सहन करू शकतात? हे सवाल अजूनही अनुत्तरीतच आहेत. मूल न. प.च नव्हे तर मूल - बल्लारपूर विधानसभेचा आमदार ठरविण्याची धमक(संख्या) ज्या समाजात आहे, ती मंडळी फुलेंच्या नाव अस्तित्वासाठी ऐवढी लाचार कशी अशीही भावनिक धारणा व्यक्त होताना दिसते. " बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर " हा बाणा आता न. प. च्या टाईमपास व अर्थपूर्ण व्यवहाराला या बाबतीत हद्दपार करू शकतो हे निश्चित.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या