बल्लारपूर :- 45 अंश सेल्सिअसच्या तीव्र उन्हाळ्यात बल्लारपूर-ऊर्जा नगर ही महत्त्वाची बस सेवा अचानक बंद झाल्याने गरीब, रुग्ण आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल गायकवाड यांनी म.रा.प. मंडळ चंद्रपूरच्या आगार व्यवस्थापकांना निवेदन देऊन तात्काळ बस सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. गेली अनेक वर्षे बल्लारपूर येथून सकाळी 10:30 वाजता सुटणारी आणि ऊर्जा नगर येथून सायंकाळी 6:00 वाजता बल्लारपूरकडे परत येणारी बस सेवा सुरू होती. मात्र मागील दोन-तीन दिवसांपासून ही बस अचानक बंद करण्यात आली आहे. ही बस बल्लारपूर मधील अनेक गरीब नागरिकांसाठी चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी जाण्याचे एकमेव साधन आहे. तसेच शाळकरी विद्यार्थी, एक्स्ट्रा क्लासला जाणारे विद्यार्थी आणि शासकीय कामासाठी जाणारे नागरिकही या बसवर अवलंबून होते. सध्या बल्लारपूर-चंद्रपूरचे तापमान 45 अंशांच्या वर गेले असल्याने उपचाराविना गरीब लोकांचे हाल होत आहेत. तात्काळ दखल न घेतल्यास, आंदोलनाचा इशारा युवा ग्रामीण पत्रकार संघ चंद्रपूरचे राहुल गायकवाड यांनी निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन सदर बस सेवा तात्काळ सुरू करावी. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. गरीब रुग्ण, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी ही बस जीवनरेषा ठरली आहे. उन्हाळ्याच्या कडकडीत उन्हात खासगी वाहन परवडत नसल्याने अनेकांना उपचारापासून आणि वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने नागरिकांची अडचण लक्षात घेऊन ही सेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणी राहुल गायकवाड यांनी केली आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या