बल्लारपूर :- मागील चार वर्षांपासून जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. आता पुन्हा ग्रामपंचायतवरदेखील प्रशासकराज आले आहे. तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायती आहे. यापैकी १२ ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांच्या हाती आला आहे. यामुळे १२ सरपंचासह १०६ सदस्यांना घरी बसण्याची पाळी आली आहे. तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या विसापूर ग्रामपंचायतीची मुदत ५ फेब्रुवारी २०२६ रोजी संपुष्टात आली आहे. यामुळे येथे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशासक म्हणून कारभार करणार आहे. तालुक्यातील नांदगाव (पोडे), मानोरा, कळमना, हडस्ती, पळसगाव, कोर्टीमक्ता, गिलबिली, आमडी, किन्ही येथील ग्रामपंचायतीची मुदतदेखील ४ फेब्रुवारी २०२६ रोजी संपुष्टात आली आहे. त्याचप्रमाणे लावारी व दहेली या ग्रामपंचायतीची मुदत ६ आगस्ट २०२४ रोजी संपली आहे. यामुळे या सर्व ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांच्या हाती गेला आहे. लावारी, दहेली, आमडी, किन्ही, हडस्ती व कोटींमक्ता येथील प्रत्येकी ७ असे एकूण ४२ सदस्य, मानोरा, कळमना, गिलबिली व पळसगाव येथील प्रत्येकी ९ असे एकूण ३६ सदस्य, नांदगाव (पोडे) येथील ११ व विसापूर येथील १७ असे एकूण १२ सरपंचासह १०६ सदस्यांचा कारभार आता प्रशासक सांभाळणार आहे. ग्रामीण विकासासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत असी त्रिसूत्री व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक लांबल्याने चार वर्षांपासून प्रशासकराज आहे. आता या मालिकेत ग्रामपंचायतीचा समावेश झाल्यामुळे ग्रामीण विकासाचा डोलारा प्रशासकीय व्यवस्था हाकणार आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक किमान वर्षभर लांबणीवर जाण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहे.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068

टिप्पणी पोस्ट करा
0टिप्पण्या