बल्लारपूर :- दिनांक ०९ सप्टेंबर २०२६ रोजी गोंडराजे बल्लाळशहा नाट्यगृह बल्लारपूर, येथे पंचायत समिती, बल्लारपूर आणि फिनिक्स साहित्य व सांस्कृतिक प्रतिष्ठान, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियानांतर्गत आयोजित पहिले जिल्हा आरोग्य साहित्य संमेलन – २०२६ मधील सत्र पहिले या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. सौ. डॉ. अल्का अनिल वाढई (नगराध्यक्षा, न.प. बल्लारपूर) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास संमेलनाध्यक्ष मा. डॉ. अभय बंग (विख्यात समाजसेवक, साहित्यिक, शोधग्राम, गडचिरोली), उद्घाटक पुलकित सिंग (भाप्रसे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर) आणि स्वागताध्यक्ष धनंजय साळवे (गटविकास अधिकारी, पं. स. बल्लारपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रमुख अतिथी म्हणून रेणुका कोकाटे- तहसीलदार, बल्लारपूर, कल्पना श्रीरसागर, डॉ. अश्विनी कांबळे, डॉ. अशोक कटारे,डॉ. आशा साळवे, डॉ. प्रशिक वाघमारे, डॉ. गजानन मेश्राम,डॉ. संदेश मामीडवार, डॉ. शुभम देवगडे, यांची उपस्थिती लाभली. आरोग्यविषयक विविध महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करताना नागरिकांचे आरोग्य, निरोगी जीवनशैली, आरोग्यविषयक जनजागृती आणि “माझं गाव आरोग्य संपन्न गाव” या संकल्पनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. डॉ. अभय बंग यांनी आपल्या मार्गदर्शनातून आरोग्याकडे केवळ आजाराच्या दृष्टिकोनातून न पाहता निरोगी जीवनशैली, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि समाजाच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी अल्का वाढई मॅडम यांनीही आपल्या मनोगतातून आरोग्यदायी समाजनिर्मितीसाठी नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, स्वच्छता व निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे आणि अशा विधायक उपक्रमांना सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले. आरोग्य आणि साहित्य यांचा सुंदर संगम घडवून आणणारे हे संमेलन निरोगी, जागरूक आणि आरोग्यसंपन्न समाजनिर्मितीच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल ठरले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या