सर्व धर्मांमध्ये वृक्षांचे महत्त्व अधोरेखित; पर्यावरण रक्षणासाठी आ. मुनगंटीवार यांचे लोकसहभागाचे आवाहन
चंद्रपूर -: वाढत्या हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी वृक्षसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देणे काळाची गरज आहे. प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणासह वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारल्यास हरित चंद्रपूरचा संकल्प साकार होऊ शकतो. चंद्रपूर जिल्ह्याला हरित विकासाचे आदर्श मॉडेल बनविण्यासाठी लोकसहभाग अत्यावश्यक असून, पर्यावरण संवर्धन ही केवळ शासनाची नव्हे तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती त्रिशताब्दी नागरी समिती व ट्रॅक्टर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सोनचाफा हनुमान मंदिर, पठाणपुरा गेट, चंद्रपूर येथे आयोजित महावृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी चंद्रपूरच्या महापौर संगीताताई खांडेकर, धर्मगुरू महाराज सुधाकर बगडे, फादर बिबिन ठेकेकारा, मौलाना फजरूल रहमान खान, भंते मंगल बुद्ध विपकी, ग्यानी लाहोर सिंगजी, डॉ. मंगेश गुलवाडे, नगरसेवक रवी लोणकर, नगरसेवक प्रज्वलंत कडू, नगरसेविका सविता सरकार, नम्रताताई ठेमस्कर, बंडू गौरकार, मनोज सिघंवी, अजय सरकार, चांद सय्यद, रंजीत ढवळे, रवी चहारे तसेच परसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वनमंत्री म्हणून राज्यात वनसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मानवाच्या जीवनातील पहिल्या श्वासापासून अंतिम प्रवासापर्यंत वृक्षांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. झाडे केवळ प्राणवायू पुरवत नाहीत, तर संपूर्ण सृष्टीचा जीवनाधार आहेत. पृथ्वीवरील जीवनचक्र अखंड ठेवण्यात वृक्षांची भूमिका अनन्यसाधारण असून, प्रत्येक नागरिकाने किमान पाच वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करणे ही काळाची गरज आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सर्वधर्मसमभाव आणि पर्यावरण संवर्धन यांचा अनोखा संबंध अधोरेखित केला. ते म्हणाले की, जगातील प्रत्येक धर्मात वृक्षांचे महत्त्व विशेषत्वाने सांगितले गेले आहे. वृक्ष कधीही जात, धर्म, पंथ किंवा आर्थिक स्थितीचा भेदभाव करत नाहीत. ते सर्वांना समान सावली, समान प्राणवायू आणि जीवनाचा आधार देतात. त्यामुळे समानता, मानवता आणि पर्यावरण संरक्षणाचा सर्वात प्रभावी संदेश वृक्षांकडूनच मिळतो. वृक्षांच्या या वैश्विक आणि सर्वसमावेशक स्वरूपातून समाजाने एकतेचा आणि निसर्गसंवर्धनाचा धडा घ्यावा, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले. राज्याचे वनमंत्री म्हणून कार्य करताना वनसंपदा, जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व जवळून अनुभवण्याची संधी मिळाल्याचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. चंद्रपूर हा वनसंपदेने समृद्ध जिल्हा असून, त्याचे हरित वैभव जपणे आणि वाढविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर लावलेल्या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करण्यावर भर दिला तरच पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट प्रभावीपणे साध्य होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या ट्रॅक्टर असोसिएशन तसेच डॉ. मंगेश गुलवाडे आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन करताना आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, अशा लोकसहभागातूनच पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक बळकट होणार आहे. वृक्षसंवर्धनाला जनआंदोलनाचे स्वरूप देत चंद्रपूरला राज्यातील हरित विकासाचा आदर्श जिल्हा बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
संपादक :- दिपक चरणदास भगत, (विद्याश न्युज), मो. 9421717068
0 टिप्पण्या